पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम   

पुणे : पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. येत्या २४ तासांत शहरात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने मुक्काम ठोकला आहे. सोमवारी पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. दिवसभरात अधून-मधून विश्रांती घेऊन हलक्या आणि मध्यम सरी पडत राहिल्या. सतत कोसळणार्‍या पावसामुळे  अनेक जण मोटारीने बाहेर पडल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वातावरणातील घडामोडींमुळे कमाल तापमानातही घट झाली होती. हवेतील गारवा वाढल्यामुळे वातावरण आल्हाददायक होते. 
 
मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पुणे शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काल सुमारे ३८ हजार घरांमध्ये वीज नव्हती. कोथरूड, कोंढवा, सिंहगड रोड आणि कात्रज परिसरात झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. 
 
मान्सूनचे काल पुण्यात आगमन झाले असून, नेहमीपेक्षा १४ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. पावसामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, शहरातील अनेक भागांवर त्याचा परिणाम झाला आहे.
 
संपूर्ण राज्यात मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.शनिवारी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले; दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्रात मान्सूनने १४ दिवस आधीच प्रवेश केला. यंदा मान्सूनचा प्रवास अत्यंत जोरदार असून, अनेक भाग व्यापले गेले आहेत.
 
जिल्ह्यातील २१ महसूल मंडळांनी ६५ मिमीहून अधिक पावसाची नोंद केली आहे.बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १४ गावे खडकवासला डाव्या कालव्याच्या भगदाडामुळे पाण्याखाली गेली आहेत. रविवारी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक एक तासासाठी थांबवण्यात आली होती.

नागरिकांसाठी सूचना

नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. वाहन चालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास, स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

वेधशाळेकडून पुणे आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात मध्य स्वरुपाचा पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर याठिकाणी जोराचे वारे वाहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.

सिंहगड, डेक्कन, प्रगती रेल्वे गाड्या उशिराने

प्रवाशांना फटका 

मुंबईत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटसिटीसह इतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या दोन ते अडीच तास उशिराने पोहचल्या. तर कायम वेळेवर धावणार्‍या ‘वंदे भारत’लाही सीएसएमटीवर पोहोचायला दोन तास उशीर झाला. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवसी कामानिमित्त मुंबईत गेलेल्या नागरिकांना फटका बसला. दिवसभरात वीस रेल्वे गाड्यांना उशीर झाला.
 
यंदा मान्सूनचे राज्यात लवकर आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यांतच जोरदार पाऊस पडत आहे. एरवी जुलै महिन्यात पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होत होता. परंतु, यंदा मे महिन्यातच पावसामुळे रेल्वे वेळापत्रक बिघडले आहे. रविवारपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी रेल्वेची गती मंद झाली आहे. शिवाय कर्जत, ठाणे, दादर, चिंचपोकळी व इतर ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रेल्वे सेवा काही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणार्‍या सिंहगड, डेक्कन, प्रगती, इंटसिटीसह सर्व रेल्वे गाड्यांना सीएसएमटीत पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास उशीर झाला. त्यामुळे कामानिमित्त मुंबईला गेलेले नागरिक रेल्वेत अडकून पडले.
 

Related Articles